Sunday, 11 June 2017

"सेवेची ठायी तत्पर" हे वाक्य कोणी लिहिलेय आणि कुठे ?

Daily Quiz # २०५ 

"सेवेची ठायी तत्पर" हे वाक्य कोणी लिहिलेय आणि कुठे ?

उत्तर :- हिरोजी इंदुलकर - रायगड - जगदीश्वराच्या पायरीवरील एका दगडावर

स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा engineer जगात होणे नाही.. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. कि जो आपल्या उभारणीचा पुरावा देतो.आताही तो रायगड पाहायला भेटतो .असे फक्त शिवकाळात होऊ शकते...आणि त्या शिलालेख प्रमाणे आज हि रायगड पाहायला भेटतो.

जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख:-
।। श्री गणपतयेनमः ।।
।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।।
।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।।
।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।।
।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।। वापीकूपतडागराजिरू ।।
।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्रसदनै ।।
।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।।
।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।
अर्थ :-
सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेपर्यंत नांदो ll

---संदर्भ: अथातो दुर्गजिज्ञासा – प्र. के. घाणेकर

शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांची काही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. रायगड, प्रतापगड, राजगड यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फक्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा कधीही दर्शनी नसे. त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना असे. उदा. रायगड, सुधागड, लोहगड हे किल्ले. दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पडता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकडे वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच.
सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे उल्लेख महत्त्वाचे आहेत. जंजिरेकर सिद्दीच्या उरावर शिवरायांनी पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला बांधला. ह्याच्या तटबंदीच्या दगडाचे चिरे लाटा आदळून आदळून झिजले आहेत. पण त्यातला चुना मात्र अजून तसाच शाबूत आहे. सिंधूदुर्गाची कहाणी काय वर्णावी. सुरतेची १ कोट लुट वापरून सिंधूदुर्गाचा पाया मजबूत केला गेला. ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर, ३००० मजूर अहोरात्र काम करायचे. ५ खंडी उकळते शिसे ओतून त्याचा पाया घडवला गेला. तर खांदेरीचा किल्ला सिद्दी आणि इंग्रज ह्यांच्या बरोबर मध्ये उभारला गेला. ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड दगडांच्या राशी आढळतात. भरतीच्या लाटा सोडाच पण साधं होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही. शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.
अलिबागच्या किल्ल्यात तर तटबंदीच्या दोन दगडांमधला दर्जा चुन्याशिवाय आहे. लाट आली की तिच पाणी दर्जा मध्ये घुसत आणि जोर उणावतो. किल्ले विजयदुर्ग तसा ८०० वर्षापुर्वीचा. पण काही वर्षापुर्वी नौदलाच्या पाणबुड्यांना एक आश्चर्य सापडले. एक पाण्याखाली बनवलेली भिंत. चांगली २ मी. रुंद आणि २५ मी. लांब. ती शिवकालीन असल्याच तज्ञांचे मत आहे. खोल समुद्रातून येणाऱ्या परदेशी जहाजांना अडथळा म्हणून बांधली गेली असावी.
सर्वोच्च दुर्गरचनाकार असे शिवरायांना म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अर्थात मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव यांच श्रेयही तितकच, साऱ्यांनीच त्यांच कौशल्य पणाला लावले. त्यांनी स्थापत्यशास्त्राचे, दुर्गरचनेचे शिक्षण कोठून मिळवले, आराखडे कसे बनवले व इतक्या दुर्गम भागात बांधकाम केले तरी कसे? कोणास ठाउक.. पण एवढं मात्र नक्की की दुर्गबांधणीमध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक-सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते. एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे.

मन मातीत मिसळली की गवतांनाही भाले फुटतात, हे या मातीने आपल्याला शिकवले आहे. या बुलंद, बेलाग आणि बळकट किल्ल्यांवरती अशाच काही घटना घडल्यात. तेथे जायचे ते अश्याच सुवर्णक्षणांच्या आठवणीसाठी. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा.


No comments:

Post a Comment